देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा १९६० ते १९७० तो कालखंड. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या सार्वजनिक गणेशॊत्सवाने राज्यभरात वातावरण भारावून गेले होते. सामाजिक एकात्मतेचा संदेश सर्वदूर पसरत हॊता. सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि आपली हिदुं संस्कृती टिकवण्यासाठी राज्यभर तरुण एकवटले जात होते त्यामध्ये दादर पूर्वेकडील नायगांवही यास अपवाद राहीले नाही. जुनी. बी. डी. डी. चाळ क्रमांक २ मधील तेव्हाच्या बाळगोपाळांनीही सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने लहान स्वरुपात श्री हनुमान जयंती उत्सव साजरा करायचे ठरवले आणि श्री. अशोक पावटे, श्री. चद्रकांत अवघडे, कै. सत्यवान माने, कै. प्रकाश पांचाळ, कै. अशोक दमामे, कै. बबन भाताडे, कै. वसंत पाटणकर, कै. गोकुळ सुर्वे, कै. मधुकर राणे यांनी आजच्या भव्य अशा श्री हनुमान जयंती उत्सव मंडळाची मुहुर्तमेढ रोवली.
सन १९६५ मध्ये स्नेहवर्धक मित्र मंडळाच्यावतीने संकटमोचन हनुमंताच्या प्रतिमेची स्थापना चाळीच्या प्रवेशद्वाराजवळच करुन हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. १९६५ ते १९७१ अशी सहा वर्षे अशाप्रकारे लहान स्वरुपात उत्सव साजरा करण्यात येत होता. उत्सवाची गोडी आणि एकात्मतेची जाणीव यातूनच पुढे चाळीतील रहिवाश्यांनी एकत्र येऊन एका हनुमान मंदिराची स्थापना करुन वर्षभर हनुमंताची भक्ती करण्याचा निर्धार केला, त्यासाठी मंदिराच्या जागेचा शोध सुरु झाला. दोन जागा निश्चित झाल्या मात्र त्यातील एक जागा सहजीवन या शासकीय इमारतीसमोर असल्याने तांत्रिक बाबींची अडचण समोर आली म्ह्णून अखेर चाळीसमोरील वड व पिपंळ या दोन पुरातन वृक्षाच्या छत्रछायेत मंदिर उभारण्याचे निश्चित झाले.रहिवाश्यांनी आपापल्यापरिने मंदिरासाठी योगदान दिले.साध्या टाइल्स वापरुन त्यावेळी मंदिराची उभारणी झाली. चाळीतील ज्येष्ठ रहिवाशी कै. भगवान पवार यांनी स्वखर्चाने श्रींची मुर्ती मंडळास देवून तिची मंदिरात प्राणप्रतिस्थापना केली.
सन १९७२ पासून उत्सव या मंदिरात साजरा होऊ लागला आणि परिसरातील इतर भक्तही मंदिरशी जोडले जाऊ लागले. वर्षामागून वर्ष गेली तशी हनुमंताच्या भक्तीसागराची व्याप्ती वाढू लागली. १९७० ते १९८० च्या दशकात मंडळाकडुन विविध समाजउपयॊगी उपक्रम राबवण्यात आले.
१९९० साली मंडळाच्या रोप्यमहोत्सवाच्या निमित्ताने काही भव्यदिव्य करण्याचा विचार कार्यकर्त्यांच्या मनात घर करु लागला आणि टाइल्सच्या मंदिराच्या विस्ताराची कल्पना कै. शिवाजी साळुंखे यांच्या मनात आकार घेऊ लागली. मंदिर संगमरवरी दगडात रुपांतरित करण्याचे ठरले. सर्व मंडळी उत्साहाने कामाला लागली. सभासद आणि परिसरातील प्रतिष्ठीत मंडळी एकत्र आली आणि वास्तूविशारद श्री. मिलिदं गाडेकर यांच्या देखरेखीखाली श्री. बाबुलाल(मिस्त्री) यांनी सुंदर, सुबक अशा संगमरवरी दगडात मंदिराचे कमळ फुलवले. कमळाच्या आकारातील या मंदिराने अनेकांची मने जिंकली. सामजिक कार्यकर्ते व व्यापारी म्हणून परिसरात ओळखले जाणारे कै. हरिश(शेठ) पाटील यांनी हनुमंताची मूर्ती मंदिराला भेट म्हणून दिली आणि तिची मंदिरात प्राणप्रतिस्थापना करण्यात आली. त्यानंतर १९९६ पासून मंडळाने महाप्रसादाची (भंडारा) प्रथा सुरु करुन भक्तांना आगळीवेगळी भेट दिली. हजारॊ भाविक गेली १९ वर्ष महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. दर शुक्रवारी रात्री मंदिर व आजुबाजुचा परिसर पाण्याने स्वच्छ धुतला जाऊ लागला. हा नित्यक्रम आजही अखंडपणे सुरु आहे तसेच श्रीची नित्यनियमित्त पुजाअर्चा केली जाते.
२००८ मध्ये एक अघटित घटना घडली. दुसऱ्या श्रावणी शनिवारी मंदिरातील मुर्तीला तडा जाऊन भंग पावली, मात्र श्री हनुमंताची माफी मागून विभागातील सर्व भक्तांनी हिमंत न हारता मंडळाच्या पाठीशी उभे राहून तत्काळ श्रींची नवीन मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली.
होळी, गुडीपाडवा, शिवजयंती, हळदिकुंकू, दहिहंडी, दिवाळी हे सण साजरे करुन मंडळ आपली पारंपारिक संस्कृती देखील जपत आहे.
कालांतराने संगमरवरी दगडावर काळे-पिवळे डाग पडू लागल्याचे लक्षात येताच सभासदांनी पुन्हा नव्याने मंदिर उभारणीची तयारी दर्शवली. विविध कारागीरांना बोलावून अभ्यास सूरु केला. कमिटीची बैठक झाली. खर्चाचा अंदाज काढला गेला. अखेर राजस्थानचे शिल्पकार श्री. गोवर्धन जगाजी यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानी कलाकुसर, कोरीव नक्षीकाम, मनमोहक आणि सुबक मंदिर २०१० मध्ये उभारण्यात आले व २२ मार्च २०१० रोजी श्रीचे मंदिर भक्तासाठी दर्शनास खुले करण्यात आले.
सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांमध्येही मंडळ कुठे हि कमी पडत नाही, मग ते टाटा रुग्णालयातील बाल कर्करुग्णाना चित्रकलेचे साहित्य, खेळणी, खाऊचे वाटप असॊ वा आरोग्य शिबीर, रुग्णाना मोफत औषध वाटप, विद्यार्थ्यांना वह्या पुस्तंकाचे वाटप असो. नामांकित डॉक्टर्स, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ तसेच विभागातील प्रतिष्ठीत मंडळी यांचे सहकार्य या मंडळाला आणि सामाजिक कार्याला नेहमीच लाभले आहे.
यंदा २०१४-१५ हे मंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कॄतिक, कला, क्रिडा या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले असून त्यासाठी श्रींचा आशिर्वाद आणि आपल्या सर्व भक्ताचे सहकर्य मंडळाला अखंड लाभेल हिच अपेक्षा.......